Header Ads

Header ADS

दुसरी कसोटी रोमांचक परिस्थितीत, इंग्लंडच्या 'बैजबॉल' आणि भारतीय फिरकीपटू यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार

Dusarī-kasōṭī-rōmān̄caka-paristhitīta-iṅglaṇḍacyā-baijabŏla-āṇi-bhāratīya-phirakīpaṭū-yān̄cyāta-curaśīcī-spardhā-hōṇāra


दुसरी कसोटी रोमांचक परिस्थितीत, इंग्लंडच्या 'बैजबॉल' आणि भारतीय फिरकीपटू यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रोमांचकारी स्थितीत पोहोचला आहे.  तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून दुसऱ्या डावात इंग्लंडने एक गडी गमावून ६७ धावा केल्या आहेत. इंग्लिश संघाला विजयासाठी अद्याप ३३२ धावांची गरज आहे. भारताने ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.  त्याचवेळी भारतीय संघाला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडची आक्रमक शैली, ज्याला 'बैजबॉल' असेही म्हणतात आणि भारतीय फिरकीपटू यांच्यात चुरशीची स्पर्धा होऊ शकते.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर आटोपला. टीम इंडियाकडे १४३ धावांची आघाडी होती. ‍भारताने दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या आणि एकूण ३९८ धावा झाल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने एका विकेटवर ६७ धावा केल्या आहेत.  इंग्लंडला दुसऱ्या डावात एकमेव धक्का बेन डकेटच्या रूपाने बसला, तो अश्विनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक भरतच्या हाती झेलबाद झाला. त्याला २८ धावा करता आल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जॅक क्रॉली २९ धावा आणि रेहान अहमद नऊ धावांसह खेळत होते.


चौथ्या दिवसाचे पहिले सत्र महत्त्वाचे ठरू शकते. सुरुवातीच्या षटकांत जसप्रीत बुमराहही टीम इंडियासाठी महत्त्वाचा असेल. तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननेही कहर केला. तिसऱ्या दिवशी भारताने एकही विकेट न गमावता २८ धावांनी पुढे खेळण्यास सुरुवात केली. अँडरसनने झटपट दोन धावा देत दोन बळी घेतले. त्याने आधी कर्णधार रोहित शर्मा आणि नंतर यशस्वी जैस्वालला तंबूमध्ये पाठवले. रोहितला १३ तर यशस्वीला १७ धावा करता आल्या. यानंतर श्रेयस अय्यरही २९ धावा करून तंबूमध्ये परतला. त्याने शुभमन गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार नऊ धावा करून बाद झाला. त्याचवेळी शुभमनने अक्षर पटेलसह पाचव्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. शुभमनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्याने ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली. अक्षर ४५ धावा करून बाद झाला. भरत सहा धावा करून बाद झाला. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांना खातेही उघडता आले नाही. अश्विनने अखेरीस २९ धावांची समंजस खेळी केली. अशा प्रकारे भारताने दुसऱ्या डावात ३९८ धावा केल्या. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने चार बळी घेतले. तर रेहान अहमदला तीन आणि जेम्स अँडरसनला दोन विकेट मिळाल्या.  शोएब बशीरने एक विकेट घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.