Header Ads

Header ADS

भारताला भारतात फक्त भारतीय क्रिकेट संघच हरवू शकतो; कमिन्स सर्वोत्कृष्ट कर्णधार रोहितची हार, ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला

 

India-only-Indian-cricket-team-could-beat-cummins-best-captain-Rohit-loss-Australia-wins-sixth-ODI-World-Cup

भारताला भारतात फक्त भारतीय क्रिकेट संघच हरवू शकतो; कमिन्स सर्वोत्कृष्ट कर्णधार रोहितची हार,

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पुन्हा एकदा करोडो भारतीय चाहत्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा ६ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात डावखुरा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने १३७ धावांची शानदार खेळी करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय लॅबुशेनने ५८ धावा केल्या. जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच भारतावर वर्चस्व गाजवले.

India-only-Indian-cricket-team-could-beat-cummins-best-captain-Rohit-loss-Australia-wins-sixth-ODI-World-Cup


ऑस्ट्रेलियाचे हे सहावे एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद ठरले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ५० षटकांत २० धावांवर सर्वबाद झाला. २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत सामना जिंकला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात उत्कृष्ट कामगिरी केली.


सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या मार्नस लॅबुशेनच्या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी केली. त्यांच्यासमोर भारताचे सर्व गोलंदाज अपयशी ठरले. हेडने शतक तर लॅबुशेनने अर्धशतक झळकावले. दोन्ही फलंदाजांनी हुशारीने डाव पुढे नेत कांगारू संघाला विजयापर्यंत नेले. मात्र, ट्रॅव्हिस सामना जिंकण्यासाठी २ धावांची गरज असताना बाद झाला.


ऑस्ट्रेलियाने ६.६ षटकांत ३ गडी गमावले असतानाही ऑस्ट्रेलियाने सामन्यावर वर्चस्व कायम राखले. कांगारू संघाला पहिला धक्का डेव्हिड वॉर्नरच्या (७) रूपाने बसला, त्याला शमीने बाद केले.  यानंतर बुमराहने पाचव्या षटकात मिचेल मार्शला (१५) तंबूमध्ये परत पाठवले. त्यानंतर बुमराहने सातव्या षटकात स्टीव्ह स्मिथला (४) आपला बळी बनवले.


ऑस्ट्रेलियाने ४७ धावांवर ३ विकेट गमावल्या होत्या. मात्र यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्सन लॅबुशेन यांची चौथ्या विकेटसाठीची भागीदारी भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली. ट्रॅव्हिस हेडने भारतीयांच्या आशा धुळीस मिळवल्या. दोघांनी २१५ चेंडूत १९२ धावा जोडल्या. मात्र, ही भागीदारी ४३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तुटली, जेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त २ धावांची गरज होती.  हेडने १२० चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १३७ धावा केल्या. तर लॅबुशेनने ११० चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ५८ धावा केल्या.


फलंदाजीतल्या सुमार कामगिरी नंतर भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराहने ९ षटकात ४३ धावा देत २ बळी घेतले. याशिवाय मोहम्मद शमी आणि सिराज यांना १ यश मिळाले.


भारतीय क्षेत्ररक्षकांकडून चांगल्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा होती.  पण महत्त्वाच्या प्रसंगी टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षकांनी निराशा केली. भारतीय क्षेत्ररक्षकांनी धावबाद करण्याच्या अनेक संधी गमावल्या.


या विश्वचषकात भारतीय गोलंदाजांनी चांगलीच छाप पाडली होती, पण जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर ते निष्प्रभ ठरले.  जसप्रीत बुमराहशिवाय मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी निराशा केली.  जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचे गोलंदाज निस्तेज दिसले.


नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचे फलंदाज ठराविक अंतराने तंबूमध्ये परतत राहिले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चमकदार गोलंदाजी केली, पण टीम इंडियाच्या फलंदाजांनी अनेक निष्काळजी फटके खेळून आपल्या विकेट्स बहाल केल्या. टीम इंडियासाठी फक्त विराट कोहली आणि केएल राहुल पन्नास धावांचा टप्पा पार करू शकले, पण त्यांनीही खेळपट्टीवर पूर्ण वेळ उभे राहाण्याचे धैर्य दाखवले नाही. याशिवाय बाकीच्या फलंदाजांचा फ्लॉप शो होता.


भारतीय गोलंदाजांनी अतिरिक्त धावांची खैरात केली. विशेषत: सुरुवातीच्या षटकांमध्ये मोहम्मद शमी आपल्या लाईन आणि लेन्थपासून विचलित होताना दिसत होता. याशिवाय अन्य गोलंदाजांची अवस्थाही तशीच होती. टीम इंडियाचे गोलंदाज खराब टप्प्यावर गोलंदाजी करत राहिले, त्यामुळे कांगारू फलंदाज सहज धावा करत राहिले.  याशिवाय यष्टिरक्षक म्हणून केएल राहुलने गचाळ यष्टिरक्षण केले. भारतीय गोलंदाजांनी १८ अतिरिक्त धावा दिल्या. ज्यामध्ये ७ बाय आणि ११ वाईडचा समावेश आहे.


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला.  भारताला हरवून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे.  आठ वर्षांनंतर तो चॅम्पियन बनला आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ मध्ये विजेतेपद पटकावले होते. हा सामना जिंकल्याने ऑस्ट्रेलियन संघावर पैशांचा पाऊस पडला आहे.  कांगारू संघाला ३३.३१ कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचवेळी भारताला १६.६५ कोटींवर समाधान मानावे लागले.


उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना ६.६६ कोटी रुपये मिळाले. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला.  त्याचबरोबर गट फेरीतून बाहेर पडलेले सहा संघ पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश आणि नेदरलँड्स या सहा संघांना ८३.२९ लाख रुपये मिळाले आहेत.  


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात २३ नोव्हेंबर पासून ५ टी२० सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.